Friday, December 17, 2010

ट्रेकिंग म्हणजे पिकनिक नव्हे ...!!

"प्रमोद मांडे" यांनी आताच्या सर्व ट्रेकर्स ला ट्रेकिंग ची खरी जाणीव करून देण्यासाठी लिहिलेला हा उत्तम लेख !!




ट्रेकिंगच्या माध्यमातून, डोंगर-द-या पायाखाली घालत, पायवाटांनी मनमुराद
भटकंती केल्यावरच महाराष्ट्राचा इतिहास, निसर्ग, जीवनपद्धती, श्रद्धा,
सामाजिक स्थिती, संस्कृती आदींचा परिचय जवळून होऊ शकतो.

महाराष्ट्र पर्यटनप्रिय लोकांचा प्रदेश आहे तसेच देश-विदेशातील लोकांसाठी
पर्यटनप्रिय प्रांत आहे. महाराष्ट्राची खरीखुरी ओळख करून द्यावयाची असेल
तर सर्वसाधारण सहली काढून या प्रांताची खरी ओळख होणार नाही. ट्रेकिंगच्या
माध्यमातून, डोंगर-दऱ्या पायाखाली घालत, पायवाटांनी मनमुराद भटकंती
केल्यावरच महाराष्ट्राचा इतिहास, निसर्ग, जीवनपद्धती, श्रद्धा, सामाजिक
स्थिती, संस्कृती आदींचा परिचय जवळून होऊ शकतो. आणि म्हणूनच भारतातील
सर्वात जास्त ट्रेकिंग गट बहुधा महाराष्ट्रातच असावेत.


गेल्या २५-३० वर्षात अनेक ट्रेकिंग ग्रूपची स्थापना झाली आहे. आजही ही
मंडळी त्याच उत्साहाने व जोमाने ट्रेकिंग छंद म्हणून जोपासत आहेत.
गिरिशिखरांपासून हिमशिखरांपर्यंत गवसणी घालत आहेत. सामुदायिकतेची व
सहकार्याची तत्त्वे पाळून सांघिक भावना जपत भटकंतीचा वसा सांभाळत आहेत.
असं असताना अलिकडे बरेचदा काही वेगळं चित्र समोर आल्यावर एकदम दातांखाली
खडा आल्यासारखं वाटतं. युवक-युवतींची अनेक टोळकी ज्या पद्धतीने द-याखो-
यांत ट्रेकिंगच्या नावाखाली हुंदडतात ते पाहून मन विषण्ण होतं. इतिहासाचा
वारसा सांगणा-या गडकिल्ल्यांवर गेल्यावर तिथला धिंगाणा, मस्ती
पाहिल्यावर, आपण एखाद्या समुद्रकिनारी फिरायला तर आलो नाही ना, अशी शंका
मनात येते.

 ऐतिहासिक वास्तूंवर, गडकिल्ल्यांच्या प्रवेशद्वारांवर लैला-मजनू
स्टाइलने ‘हृदय-बाण’ खडूने रंगवून स्वत:ची नावं लिहिणं, मुक्कामाच्या
ठिकाणी विनाकारण गोंगाट करणं, उरलंसुरलं खाणं, खरकटं, कागद,
प्लास्टिकच्या पिशव्या इत्यादी वाट्टेल तसं इतस्तत: फेकून देणं, दारूच्या
पार्ट्या, स्थानिक गावकऱ्यांशी अरेरावीने बोलणं, असं बरंच काही या
बेदरकार तरुणाईबद्दल सांगता येईल. कदाचित गडकिल्ल्यांवर जाण्याचा सुलभ
मार्ग, वाहनांची सहज उपलब्धता अत्यंत बेफिकीर वृत्तीही याला कारणीभूत असू
शकेल. ट्रेकिंग म्हणजे हिलस्टेशनला भेट देऊन मौजमजा करण्यासाठी केलेली
पिकनिक नक्कीच नाही. याच बेलाग गडकोट, किल्ल्यांच्या साक्षीने छत्रपती
शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. सह्याद्रीतील
अनेक मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची स्थापना केली, राजांना रायगडावर
राज्याभिषेकही झाला आणि म्हणूनच सह्याद्रीच्या कुशीतील गडकोट आपण
दैवतासमान पवित्र मानायला हवेत.
 या तरुणाईच्या उत्साहाला व जोशाला योग्य दिशा देण्याची, मार्गदर्शन
करण्याची तसेच ट्रेकिंगबद्दल गैरसमज दूर करण्याची जबाबदारी जुन्याजाणत्या
ट्रेकिंग संस्था आणि अनुभवी गिर्यारोहकांची आहे. ट्रेकिंग हा क्रीडा
प्रकार स्पर्धात्मक नाही. अनुभवी संस्थांच्या मार्गदर्शनाखाली
महाविद्यालयीन स्तरावर ट्रेकरचे ग्रूप स्थापन केल्यास या उत्साहाला योग्य
दिशा मिळू शकते, बऱ्याच गैरप्रकारांना आळा बसू शकतो व तरुणांमध्ये सक्षम
नेतृत्वगुण निर्माण करण्यासाठीही त्याचा फायदा होऊ शकतो. प्रत्येक
ट्रेकच्या प्रारंभीच तेथील रहिवाशांशी संपर्क साधावा, आदराने बोलावं,
त्या परिसराची ऐतिहासिक, भौगोलिक माहिती करून घ्यावी. शक्य असल्यास
त्यांना सोबत येण्याची विनंती करावी. एकूणच, त्यांच्याशी जवळीक साधावी.
निसर्गापुढे नतमस्तक होऊनच ट्रेकिंगला प्रारंभ करावा. डोंगर, गड-
किल्ल्यांवर जाण्याचा मार्ग कितीही सोपा वाटत असला तरी हलगर्जी, जरासा
बेसावधपणा घात करू शकतो. अपुऱ्या साधनसामग्रीसह ट्रेकला जाणं टाळावं. या
क्रीडाप्रकारात कोणतीही हार-जीत नाही. माथा गाठल्यावर आपण कोणावरही मात
केलेली नसते वा विजयही प्राप्त केलेला नसतो. परंतु मिळणारा आनंद अवर्णनीय
असतो. प्रारंभापासूनच उत्तम सवयी, खबरदारी, संयम व शिस्त अंगी बाणवल्यास
अहंभाव आपोआप निघून जाऊन तुम्ही भटकंतीचा आनंद अगदी उतारवयापर्यंत मिळवत
राहाल याची हमी मी देतो!

 
-प्रमोद मांडे

No comments:

Post a Comment